Sunday, August 14, 2011

पुस्तकं

१. चित्रे आणि चरित्रे - व्यंकटेश माडगूळकर

पुस्तकं, जंगल, चित्रकला या तीनही गोष्टींबद्दल आदर आणि आवड असल्यामुळे हे पुस्तक मला फारच आवडलं. खूप मोठे लेखक लहानपणीच का वाचले नाहीत याबद्दलची खंत आता वाटते, त्यात व्यंकटेश माडगूळकरांचं नाव अॅड झालं.

त्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल (ज्यातली काही जंगल सफर, निसर्गाभ्यासावर आहेत), केलेल्या शिकारींबद्दल – नंतर मतपरिवर्तन झाल्यामुळे सोडलेल्या या छंदाबद्दल, पु. भा. भाव्यांसारख्या आवडत्या स्नेही कथाकाराबद्दल, परदेशातल्या चित्रांच्या-शिल्पांच्या संग्रहालयांबद्दल, व्हॅन गॉगच्या गावात, कर्मभूमीत गेल्याच्या अनुभवाबद्दल, तिथे विकत घेतलेल्या चित्रकलेच्या साहित्याच्या अप्रुपाबाबत, गावातल्या जुन्या-नव्या माणसांबद्दल लिहिलेलं हे पुस्तक आहे.

खरी, मनापासूनची आणि देशी भाषा वाचून मला खूप छान वाटलं. आणि माडगूळकरांनी काढलेली स्केचेस पाहून यांनी चित्रकलेत अजून लक्ष घातलं असतं तर मला तेही एक पुस्तक घेता आलं असतं असं वाटलं.




२. एका खेळियाने.. – दिलीप प्रभावळकर

इतक्या विविध भूमिका का आणि कशा केल्या, ज्या भूमिका लिहिल्या, त्या का लिहिल्या, पूर्वी केलेली नाटकं, मालिका नंतरचे मराठी आणि हिंदीही चित्रपट, या सगळ्या कामांदरम्यान भेटलेली माणसं, आलेले अनुभव याबद्दल अत्यंत नेटकेपणाने कुठेही लिखाण भरकटू न देता केलेलं हे पुस्तक आहे.

‘चिमणरावाच चऱ्हाट’, ‘साळसूद’ या मालिकांबद्दलचे अनुभव वाचायला मला जास्त मजा वाटली कारण ‘साळसूद’ मी दूरदर्शनवर पूर्ण पाहिलेली आणि अतिशय आवडलेल्या मोजक्या मालिकांतली एक आहे आणि ‘चिमणराव’ संपूर्ण मालिका पाहिली नसली तरी (‘बालचित्रवाणी’मध्ये बहुधा) त्याचे काही भाग पाहिल्याचं आठवतंय.

मुळात लहानपणीच्या, केवळ दूरदर्शनच (तेही आईबाबांच्या परवानगीने) बघता येण्याच्या काळातल्या खूपशा आठवणी या पुस्तकाने जाग्या झाल्या. म्हणून या पुस्तकाचं महत्त्व वाटतं.

खेरीज दिलीप प्रभावळकरांचं नट आणि माणूस म्हणूनही श्रेष्ठत्व वाटत राहातं.

मधल्या सुट्टीनंतर

ब्लॉगचा दुसरा वाढदिवस आला आणि गेला, त्यालाही आता चार महिने उलटून गेले.

लिहावंसं वाटूनही कंटाळा आल्याने लिहिलं नाही.

मध्यंतरी एकदम बरीच पुस्तकं विकत घेता आली, काही असलेल्या संग्रहातली वाचायची राहिलेली वाचता आली. जमलं तर पुढच्या काही पोस्ट्स त्याबद्दल लिहीन असं वाटतं.

Friday, November 26, 2010

बिफोर सनराईज आणि बिफोर सनसेट

. . .बिफोर सनराईज . . .
. . .बिफोर सनसेट

मुंबई-पुणे-मुंबई हा सिनेमा ज्या इंग्रजी सिनेमांवरून घेतलाय (?, चोरलाय) ते हे दोन सिनेमे. एक मुलगा आणि एक मुलगी एका ट्रेनच्या प्रवासात भेटतात. एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात. ब-याच गप्पा वेगवेगळ्या विषयांवर मारतात. सुरुवातीला साध्यासुध्या विषयांवर असलेल्या गप्पा नंतर थोड्या अडनिड्या, अवघड विषयांवर पण होतात. एक सबंध संध्याकाळ, रात्र ते एकमेकांसोबत असतात. वेगवेगळे अनुभव घेतात. मजा करतात. एका प्रवासात भेटलेल्या दोन माणसांची साधी गोष्ट आहे खरं तर. पण उगीचच वाढीव भावूकता, नाट्यमयता न आणता सुंदर मांडलीये.

बिफोर सनसेटमध्ये नऊ वर्षांनी तेच दोघं जण परत भेटतात. तोपर्यंत त्याचं लग्न झालेलं असतं, त्याला लहान मुलगा असतो आणि ते दोघं भेटलेल्या संध्याकाळ-रात्रीवर आधारित एक पुस्तक लिहून तो लेखक झालेला असतो. या मधल्या वर्षांमध्ये त्यांचा एकमेकांशी कोणत्याच मार्गांनी काहीच संपर्क नसतो. इतक्या वर्षांनी भेटल्यावर मधल्या काळातल्या घडामोडी, अनेक नातेसंबंध, कुटुंब वगैरे ब-याच विषयांवर त्यांच्या गप्पा होतात. आधीच्या भेटी इतक्याच इंटेन्सिटीने ते एकमेकांशी बोलू शकतात.

या सिनेमाचे संवाद लिहिताना सिनेमातल्याच नट आणि नटीची मदत घेतलेली आहे, त्यामुळे खूपच नैसर्गिक, स्वाभाविक संवाद आहेत. रोमान्सची भडक कल्पनाच भारतीय सिनेमांमध्ये अनेकदा दिसते त्याच्या अगदी विरुद्ध असा खूप मस्त सिनेमा आहे हा.

आकर्षण, प्रेम, स्नेह, जिव्हाळा, जवळीक, नातेसंबंध यांच्यावर वाचायला, लिहायला, पाहायला ज्यांना आवडतं त्यांनी हे दोन्ही सिनेमे जरूर पाहावेत असं वाटतं.

Thursday, April 1, 2010

ब्लॉगचा पहिला वाढदिवस.

आज ब्लॉगचा पहिला वाढदिवस. अवधूतने आग्रह केला आणि मदतही केली म्हणून ब्लॉग उघडू शकले. वर्षभरात नियमीतपणे नाही तरी अधूनमधून काही लिहू शकले. मला हे लिहिताना मजा आली. आपण काहितरी लिहीलंय आणि कुणीतरी ते वाचतंय, त्याच्यावर वाटलं तर काही प्रतिक्रिया देतंय ही भावनाच सुखावह आहे. प्रतिक्रिया नाही मिळाली तरीही अनुभवलेलं काहीही, केव्हाही, कसलंही बंधन न बाळगता लिहिता येण्याचं स्वातंत्र्य मला आवडलं.
एका वर्षात बरेच वेगवेगळे अनुभव आले किंवा घेता आले. त्यातल्याच काही अनुभवांबद्दल लिहिलं. आणि आयुष्याच्या या वळणावर एकूणच आनंद, मजा, सुख या सगळ्याची कमतरता भासत असताना ब्लॉग वर काही लिहिण्याचा अनुभव आनंददायक वाटला.

आता या ब्लॉगच्या ‘पहिल्या’ वाढदिवसाबद्दल लिहितेय तर अनेक पहिल्या गोष्टी आठवतायत आयुष्यातल्या. कदाचित पुढची पोस्ट त्याबद्दल लिहेन.

Tuesday, March 30, 2010

"आपण आपलं आपलं जाऊ.."

सहज म्हणून एकदा एका चांगल्याशा हॉटेल मध्ये गेलो होतो. जेवण झाल्यावर लिफ़्टपाशी आलो तर एक लहान मुलगा तिथे रेंगाळला होता. एकदम निवांतपणे, आजूबाजूला काय चाललंय याचा अजिबात विचार न करता त्याचं स्वतःशी काहीतरी गुणगुणत खेळणं सुरू होतं. आम्ही त्याला मध्येच खेळात disturb न करता त्याचे आईबाबा कुठे दिसतायत का ते पाहीलं पण ते लगेच काही दिसले नाहीत. मग आमची लिफ़्ट्मध्ये आत जाण्याची वेळ आली तेव्हा तोही आमच्या बरोबर आत यायला लागला तर त्याची आई कुठूनशी आली आणि त्याला म्हणाली, " चल बेटा, त्यांच्यात नको जाऊ. आपण नंतर आपलं आपलं जाऊ, ये इकडे." तो त्याच्या आईचा हात धरुन मागे झाला.

लहान मुलं त्यांच्या आई-वडीलांकडे बघून, त्यांचं अनुकरण करत करत शिकतात म्हणे. तो मुलगा काय शिकला असेल त्याच्या आईच्या या बोलण्यातून?- हे ‘आपलं आपलं’ नावाची काहीतरी भानगड असते हे की घरातल्या माणसांखेरीज अन्य माणसांशी शक्यतो जवळीक करायची नसते हे की संशय, संकुचितपणा की आणखी काही?
कुणास ठाऊक काय शिकला? आपल्याला काय करायचंय? ते त्यांचं त्यांचं पाहूदेत, आपण आपलं आपलं पाहू..
(माझ्यात ही ‘आपलं आपलं’ म्हणजे काहीतरी वेगळं असण्याची भावना कितपत आहे?- तीव्र, मध्यम की कमी? शोधायला हवं.)

Wednesday, March 17, 2010

आवाज..

रात्रीची बारा- साडेबारा किंवा त्याच्यापुढची कुठलीही वेळ.. आठवड्यातला कोणताही दिवस.. तुम्ही दिवसभराच्या प्रचंड कामाने दमलेले.. तुमच्या घराला खरं तर खोलीला latch ची सोय नाही.. तुमच्या दोन रूम पार्टनर आहेत.. त्या रोज असंच सहज म्हणून कुठेतरी गेलेल्या असतात.. तुम्ही बराच वेळ त्या येण्याची वाट बघून झोपायचा विचार करता.. सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही रात्री अपरात्री कितीही वाजता उठून त्यांच्यासाठी दार उघडलेलं असतं.. पण हे रोजचं झाल्यावर तुम्ही कंटाळता.. मग बराच विचार, धीर वगैरे करून तुम्ही दार नुसतं लोटून घेऊन झोपायला लागता.. (आणि संदीप खरेच्या कवितांनी बाकी काही नाही तरी 'पायी रुतल्या काचांचा त्रास करून न घेता त्याची नक्षी मांडायला शिकवलेलं असतंच..) तुम्हाला अर्थातच स्वस्थ झोप लागत नाहीच कारण तुमचं 'दिल' ' all izz welll ' असं सांगून ऐकणार्यातलं नसतं.. हळूहळू तुमची प्रगती होत होत तुम्हाला याही परिस्थितीत झोप नाही तर निदान गुंगी तरी यायला लागते..
आणि मग....
तुमच्या रूम पार्टनर रूमवर येतात.. लोटून घेतलेलं गंजकं लोखंडी दार पहिला आवाज करतं.. तिथून पुढे आवाजांची मालिका सुरु होते.. संडल्सचे वेल्क्रो काढल्याचे आवाज.. हातातल्या प्लास्टिक पिशवीच्या चुरगाळल्याचा आवाज.. ती कुठंतरी खाली ठेवल्याचा आवाज.. बाथरूमचा दिवा लावतानाचा बटणाचा आवाज.. बाथरूमचं दार उघडल्याचा, पाण्याचा नळ सोडल्याचा, पाय एकमेकांवर घासल्याचा, साबणाची डबी उघडल्याचा, कधी कधी ती पडल्याचा आवाज.. पाय घासत चालल्यामुळे होणारा आवाज (आपले पाय साधं चालताना पण किती आवाज करतात यांसारख्या क्षुद्र विषयांवर विचार करायला तुमच्या रूम पार्टनर्सना वेळ नसतो).. sack मधून वस्तू काढल्याचा आवाज, त्यावेळी sack च्या पहिल्या छोट्या कप्प्यात असलेल्या अनेक पेनं- पेन्सिलींचे आतल्या आत होणारे आवाज.. दाट केस खसाखसा विन्चराल्याचा आवाज.. पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडल्याचा, त्यातून गटागट पाणी प्यायल्याचा आवाज.. मग चादर झटकल्याचा, उशी नीटनेटकी केल्याचा आणि सरतेशेवटी त्यांना गरजेचा असतो म्हणून मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी इयर फोन च्या वायारींचा गुंता सोडवण्याचा आवाज.. मग गाढ झोपेमध्ये घोराल्याचा आवाज.. हा कदाचित त्यांच्याकडून होणारा किंवा होत राहणारा शेवटचा आवाज..

ह्या सगळ्या आवाजांमध्ये तुम्ही काय करता?? - निश्चयपूर्वक शांत झोपण्याचा प्रयत्न.. श्वासावर नियंत्रण.. आपल्याला अजिबात त्रास होत नाहीये, अजिबात राग आलेला नाहीये असं स्वतःच्या मनाला पटवण्याची धडपड.. आणि गेला बाजार अशी काहीतरी पोस्ट लिहिण्याचा विचार..

Sunday, March 14, 2010

संकल्पाचं बळ.

मध्यंतरी एकदा मला अचानक 'संकल्पाचं बळ' या विषयावर बोलावं लागलं. 'बोलावं लागलं' म्हणजे मला इच्छा नव्हती बोलायची पण 'पार्ट ऑफ माय ड्युटी' म्हणून करावं लागणार होतं. एकतर मला अशा अवघड नावं असलेल्या विषयांवर, औपचारिक असं फारसं बोलता येत नाही. समोर बरीच माणसं काहीतरी चांगलं, महत्वाचं ऐकायला मिळेल अशा अपेक्षेनी बसलेली असताना आपण मात्र जाऊन आपल्या थोटक्या अनुभवानिशी, फारसा आवाका नसलेलं काहीतरी बोलून यायचं हे मला अन्यायकारकच वाटतं. पण बोलायलाच लागणार म्हटल्यावर ठरवलं की 'आपण काही संकल्प केले असतील आयुष्यात त्याबद्दलच बोलावं'.

मला वाटतं- 'संकल्प म्हणजे, आपण जे काही ठरवतो आयुष्यात- कोणत्याही परिस्थितीत कसं वागायचं, काय करायचं, कसं करायचं ते असावं'. बरेचदा आपण आपले संकल्प शब्दांत मांडत नाही. अनेकदा तशी गरजच पडलेली नसते किंवा त्याबद्दल विचार केलेला नसतो किंवा असे काही संकल्प वगैरे असतात असं मुळात अनेकांना वाटतंच नाही (आणि बरेचदा दुसर्याचे संकल्प ही खिल्ली उडवण्याची गोष्ट असते.)
तर मी विचार करत होते कि माझे काय संकल्प होते किंवा आहेत आयुष्यात? मी केव्हा शब्दांत मांडले माझे संकल्प? नीटसं
आठवत नाही पण आई-बाबा, शाळेतले शिक्षक यांनी जे सांगितलं, शिकवलं ते सतत घोकून, तसंच वागायचा प्रयत्न करताना असेल किंवा थोडेथोडे स्वतःचे विचार करायला जमायला लागलं- कुठलीही गोष्टं स्वतःच्या निकषांवर पडताळून पाहायला हवी असं वाटायला लागलं तेव्हापासून असेल, नक्की कधी ते आठवत नाही.

नेहमीचं शांत, निवांत आयुष्य सुरु असताना संकल्पाचं, ते शब्दांत मांडण्याचं, त्याबद्दल विचार करण्याचं महत्त्वं बहुदा वाटत नाही पण जेव्हा कठीण, अनपेक्षित परिस्थितीला किंवा संकटाला तोंड द्यावं लागतं तेव्हा हे महत्त्वं पटतं.
मला आनंदात, उत्साहात, मुक्तपणे राहायला आवडतं. अंगावर घेतलेलं काम नेटानी पूर्ण करायला आवडतं. प्रामाणिक असायला आवडतं आणि असंच काहीबाही.. तर असं सगळं- शहाण्यासारखं सुरळीत आयुष्य सुरु असताना खूप सोपं होतं पण आता जरा वेगळ्या वळणांनी चाललंय आयुष्य तर ह्या सगळ्या ठरवलेल्या गोष्टी पाळणं कष्टाचं वाटतंय. तरीही शब्दांत नीट मांडलेले संकल्प मदतीला येतात असंही जाणवतंय.

हे सगळं का लिहीलं मी आत्ता तर- अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा पडताळून पाहतेय सध्या स्वतःबद्दल त्यात हेही तपासू म्हटलं आणि तपासताना लिहावंसं वाटलं इतकंच.