लहानपणी खुपदा ह्या विषयावर निबंध लिहीलाय. तेव्हा काय लिहायचे ते नीटसं आठवत नाही.
पण मुंबईत राहत असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आजी-आजोबांकडे जाण्याचा प्रवास कायमच अविस्मरणीय असायचा. कदाचित त्याबद्दलच लिहिलं जात असेल.
नंतर शिक्षणासाठी पुण्यात रहायला लागल्यापासून कोणत्याही सुटीत होस्टेल मधून घरी जातानाचा रात्रीचा प्रवास सुद्धा अर्थातच आठवणीत राहायचा- बस मधे बसल्यापसूनच काय काय आठवणी येत रहायच्या.. रत्नागिरी जवळ यायला लागलं की सगळे जुने गंध, त्याच्याशी संबंधित आठवणी, मग आई, बाबा, आजी, आजोबांचे चेहेरे, बाबाना 'स्टँड़ वर न्यायला येऊ नका' असा सांगितलंय तरीही ते नक्कीच आलेले असणार हा विचार असं काही मनात असतानाच प्रवास संपायचा. मग परतीचा प्रवास सुद्धा काही ना काही कारणाने लक्षात राहायचाच. बस मधे लागलेला टुकार सिनेमा, कुणीतरी दिलेला त्रास किंवा पहाटे रिक्शा मिळेल की नाहीं?, होस्टेल च गेट उघडण्यासाठी वॉचमन काका उठतील की नाही? हे प्रश्न तर कायमच असायचे आणि झोप उडवायचे. या प्रवासांमध्ये सगळे पेंडिंग विचार पूर्ण करता यायचे. या सगळ्याची फार मजा वाटायची. पण कधी याच्याबद्दल लिहिलेलं मात्र नाही कारण फारस लिहिण्यासारखं काही वाटलंच नाही.
आता खरंच विचार केला तर केवळ निबंध लिहिण्यापुरता नाही तर खरोखरच आयुष्यभर लक्षात राहील असा प्रवास करण्याची संधी मिळाली. ३१ ऑगस्टला अचानक ऑफिसच काम निघालं आणि सरांबरोबर कार मधून मुंबईला जाता आलं. सरांसोबत जायला मिळणार या गोष्टीच अप्रूप होतच पण तीन तास मी कार मध्ये काय करणार असा प्रश्न मला पडला होता. कारण सर गाडीत वाचन करतात, खूप कामाचे फोन सुरु असतात हे सगळं मला माहिती होतं. सरांशी बर्याच गोष्टी बोलाव्यात अस वाटत होतं पण आपल्या प्रोब्लेम्स साठी सरांचा वेळ घ्यावा की नाही हा संभ्रम होता.
मग असंच बोलायला सुरुवात केली तर एरवी बोलायला अवघड विषयांवरसुद्धा खूप सहजपणे बोलू शकले. आत्महत्या करणं irrational का?, पुस्तकं, चाणक्य मंडल मध्ये चालणारे courses, मुंबईतला बकालपणा, माणसं, त्यांचे स्वभाव, मानसशास्त्र, UPSC ची परीक्षा, ती देणारे विद्यार्थी, राजकारण, चांगल्या माणसांनी राजकारणात जाण्याची गरज, समाज. आजकाल मुलांवर होणारे किंवा न होणारे संस्कार, आस्तिक आणि नास्तिक, देवाचं अस्तित्व आहे का? असेल तर कुठल्या स्वरुपात?, एकूणच शाळेच महत्त्व, योग शिक्षण, लेखक, सरांचे प्रशासनातले अनुभव, मॅक्डोनाल्ड्स, पिझ्झा-बर्गर, एकूणच आयुष्य, पुनर्जन्म, आणि असं काय काय विषयांवर सर काय काय सांगत होते आणि मी नुसतं ऐकत होते किंवा काही सुचलं तर बोलत होते. या सगळ्या संभाषणात कुठलाच विषय वर्ज्य नव्हता. बर्याचशा अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं मिळाली.
माझ्या कुवतीनुसार जेवढ घेता आलं तेवढ घेतलं, नाही कळलं ते परत विचारलं, शक्य झालं तेवढ लक्षात ठेवलं, क्वचित काही वेळा जे सुचलं ते बोलले, पण एकूणच जातानाचा आणि येतानाचा असे दोन्ही प्रवास आयुष्यभर तारखेसकट लक्षात राहतील असे झाले.
सिनेमाला जसा climax असतो तसा या प्रवासाचा climax सांगायचा तर परत पुण्याला पोहोचल्यावर सरांच्या घरी आधी गाडी थांबली नंतर driver काकांनी मला होस्टेलवर सोडलं. सरांच्या बिल्डिंगपाशी आलो तसं सरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला- त्या स्पर्शातून काय काय जाणवलं ते शब्दांत सांगणं केवळ अशक्य आहे. खूप कमी वेळा असतात आयुष्यात जेव्हा कुणीतरी काहीतरी आश्वासक करण्याची गरज वाटत असताना खरंच कुणाचीतरी एखादी कृती हवं ते सगळं देऊन जाते. माझ्या बाबतीत तसंच झालं. आपण योग्य मार्गावर चाललो आहोत, पुढे अगदीच सगळा अंधार नाही असं जाणवलं.. एकूण काय तर खूप छान वाटत राहिलं आणि तेव्हा मिळालेली energy मी अजून वापरू शकतेय...
माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सर्वात great प्रवास.....
Friday, September 25, 2009
Subscribe to:
Posts (Atom)