Monday, November 16, 2009

ताडोबा...

यावर्षीची दिवाळी कुठेतरी लांब जाऊनच साजरी करायची असं ठरवलं होतं. ताडोबाला जायचा पर्याय समोर आल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मित्र-मैत्रिणींना कळल्यावर 'वाघ काही दिसणार नाही त्यामुळे उंदीर मांजरांचे फोटो काढ' वगैरे सल्ले मिळाले होते. खरं तर ताडोबाला जाण्यामागाचा उद्देश्श वाघ बघणे असा नव्हता.

मला जंगलाचा वास खूप आवडतो. माणसांपासून लांब राहायला, एकांतात विचार करायला, निसर्गात नुसतं असायला, काहीही कारण नसताना दूरवर बघत बसायला मिळणं हे मला खूपच आनंददायक वाटत.

रेल्वे मधून रात्रभर प्रवास करण्यापासून ते 'व्याघ्र प्रकल्प' असलेल अभयारण्य बघण्यापर्यन्तचे अनेक अनुभव माझ्यासाठी नवीन होते.
ताडोबात जाऊन काय काय शिकले?- निसर्गाचा मुक्तपणा, स्वच्छंदीपणा, उदारता, भव्यता, शांतपणे दान देत राहणं.. प्राणी आणि पक्ष्याचं एकमेकांना काही त्रास न देता एकत्र राहणं.. तिथल्या माणसाचं निसर्गाप्रती असलेलं खरंखुरं प्रेम, जंगलावर प्रण्यांचाच हक्क आहे आणि आपण तिथे उपरे आहोत हि प्रामाणिक भावना.. आणि असं बरंच काही..

(काहीही अपेक्षा ठेवली नसतानाही वाघ दिसला तो अनुभव ग्रेट आहे. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी लिहीन.)

Friday, November 13, 2009

गंधच्या निमित्ताने...

मध्यंतरी सचिन कुंडलकरांचा 'गंध' सिनेमा पाहिला. एकूणच विषय, मांडणी, संवाद, दिग्दर्शन, कलाकार, त्यांची कामं आणि सर्वच दृष्टीने सिनेमा खूपच चांगला वाटला. यापूर्वी त्यांनी चेतन दातारांवर लिहिलेला लोकसत्तातला लेख आणि 'मिळून सार्याजणीच्या' दिवाळी अंकात सुमित्रा भावे यांच्यावर लिहिलेला लेख सोडता बाकी काहीच लिखाण वाचनात नव्हतं. अजूनही नाही.

'गंधची' तोंड भरून स्तुती ऐकून अवधूतने कुंडलकरांचं 'कोबाल्ट ब्लू' पुस्तक भेट दिलं. एका बैठकीत सहज वाचून होईल अशा आकाराचं ते पुस्तक आहे. सलग दोनदा वाचलं तरी नव्याने काही मिळाल्यासारखं वाटत होतं. त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर, त्यांच्या नातेसंबंधांवर खूप विचार केला जाऊ शकतो असं वाटलं.

सरळसोट मध्यमवर्गीय आयुष्य जगताना फारशा उत्कट, सर्वांगानं जीवन जगणाऱ्या, प्रतिभासंपन्न, बेडर, संवेदनशील, मुक्त अशा व्यक्ती फारशा भेटत नाहीत. भेटल्या तरी त्या आपल्या जवळच्या वर्तुळातल्या असू शकतातच असं नाही तेव्हा पुस्तकातल्या, सिनेमातल्या व्यक्तिरेखा अशा दिसल्या तर मस्त वाटतं.

...आणि आता मी जुन्या आठवणी वगळून पुढे आठवण्यासाठी नव्यानेच काही अनुभव घ्यायला बघतेय ज्यात आधी वाचलेली पुस्तकही वाचायला नको वाटतं तर 'कोबाल्ट ब्लू' हा माझ्यासाठी खूपच चांगला अनुभव ठरलाय. ( तसं गौरी देशपांडे याचं कुठलंही पुस्तक असं मस्त वाटण्याचा अनुभव देतंच त्यामुळे तीही पुस्तकं हल्ली कायम सोबत असतात.)
आता असे मस्त आठवणीत ठेवावेतच असं वाटणारे अनुभव आले की लिहीन..