Friday, February 19, 2010

Battle to save the Tiger च्या निमित्ताने...

ताडोबात जाऊन आल्यापासून व्याघ्रदार्शनाच्या अनुभवाबद्दल लिहायचं होतं पण राहून गेलं. आता वसुंधरा फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने त्या आठवणी पुन्हा जाग्या होताहेत तर लिहायचं ठरवलं. 'Battle to save the Tiger' नावाची एक मस्त फिल्म परवाच पाहिली त्यात वाघांच धोक्यात आलेलं अस्तित्व आणि त्या अनुषंगाने काही विषय मांडलेत.

तर ताडोबातल्या सुरुवातीच्या तीन दिवसात बरेच प्राणी आणि पक्षी दिसले. चितळ,गवा,ससे, मुंगुस, शेकरू, माकड, वानर, चौशिंगा, रानडुक्कर असे प्राणी आणि खंड्या, बगळे, सातभाई, पाणकोंबडी, मोर, लांडोर, पोपट, घुबड यांच्यासारखे पक्षी आणि असेही काही ज्यांची नावं नीटशी माहित नाहीत. एक दिवस हत्तीवरून सगळं जंगल फिरून आलो तरी वाघ दिसला नव्हता. पण तरीही प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक वास्तव्याच्या ठिकाणी पाहताना खूप मजा येत होती. वाघ बघण्यासाठी खूप विशेष प्रयत्न करायचे नाहीत असं आधीच ठरवलं होतं कारण वाघ बघण्याच्या नादात बाकी काहीच पाहिलं नाही किंवा ते पाहण्यातली मजा घालवली असं करायचं नव्हतं.

एक दिवस 'मचाणावर बसण्याचा' अनुभव घ्यायला म्हणून बाहेर पडलो आणि एका मचाणावर जाऊन बसलो. तिथे खूपच डास चावत होते. मचाणापासून जवळच एक तळ होतं. तिथे एक हरीणांचा कळप निवांत फिरत होता, बरीच माकड झाडांवरनं मस्ती करत होती. एक घुबड खूप वेळ ध्यान करत असल्यासारखं एका फांदीवर बसलं होतं. बराच वेळ नुसत्या डोळ्यांना दिसेल ते आणि अधूनमधून दुर्बिणीतून जे दिसत होतं ते बघण्यात गेला आणि असंच इकडेतिकडे बघत असताना एक चट्टेपट्टे असलेला चेहेरा आपल्या मचाणाकडे बघतोय असं जाणवलं. नीट बघितल्यावर लक्षात आलं कि तो वाघ आहे. तो नक्की वाघच आहे हे कळल्यावर जे जाणवलं ते शब्दात नेमकं मांडता येणार नाही. पण कानात प्राण आणून ऐकणे आणि डोळ्यात प्राण आणून बघणे म्हणजे काय ते मला त्या दिवशी ताडोबात जाणवलं. वाघ दिसल्यापासूनचा प्रत्येक क्षण फक्त त्याच्या हालचाली बघण्यात आणि शक्य तितके त्याचे आवाज ऐकण्यात गेला. एरवी जवळपास वाघ असेल तर इतर प्राणी कॉल देऊन एकमेकांना सावध करतात पण त्याच्या हालचाली जाणवेपर्यंत इतर प्राण्यांना बराच वेळ लागला. मात्र एकदा वाघ आहे म्हटल्यावर बाकी सगळे प्राणी लांबवर पळून गेले.
आम्ही एकटकपणे त्याच्याकडे बघत होतो. तो ऐटीत चालत चालत एका झाडापाशी पोहोचला. मध्येच तो गुरकावल्यासारखे आवाज करत होता. झाडाच्या सावलीत बसल्यावर त्याने पुढचे पाय थोडे ताणून आळोखे पिळोखे दिले. आपल्या जबड्यावरून त्याने जीभ फिरवली, तोंडावर येणाऱ्या माश्या, चिलट पंजांनी झटकली आणि तो पुन्हा मचाणाकडे बघायला लागला. त्याचं चालण, गुरकावण, आजूबाजूच्या परिसरावर नजर फिरवण हे सगळ इतकं ग्रेसफुल होतं कि या प्राण्याने असं आपल्या समोर वावरत रहावं आणि आपण नुस्त त्याच्याकडे बघत रहावं असं वाटत होतं. मधल्या काळात जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याचं शूटिंग केलं, शक्य तितके फोटो काढले आणि नुस्त त्याच्याकडे पाहत थांबलो. कदाचित कुणीतरी आजूबाजूला आहे हे लक्षात आल्यामुळे असेल पण तो निघण्यासाठी उठला आणि आला तसा आपल्या तोर्यात निघून गेला.

वाघ हे अत्यंत उमदं जनावर मी जे त्या दिवशी ताडोबात पाहिलं तो माझ्यासाठी एक अत्यंत आनंददायक आणि अविस्मरणीय अनुभव ठरलाय. आज हे लिहिताना सुद्धा मला तो क्षण जगतेय असं वाटतंय. सर्वांनाच एकदातरी असा अनुभव घ्यायला मिळावा असं वाटतं.

Tuesday, February 16, 2010

'ग्राफिटी वॉल'

कविता महाजन यांचं 'ग्राफिटी वॉल' नुकतंच वाचलं. केवळ एक व्यक्ती म्हणून (स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही) लिहिणाऱ्या कमी माणसांमधल्या त्या वाटतात. 'ब्र', 'भिन्न' किंवा क्वचिद कुठेतरी वाचलेल्या कविता यातून त्यांच्या लिखाणाविषयी काही मतं तयार झाली आहेत.

आजकाल एकूणच स्वतःला जे वाटतं ते बोलणं, लिहिणं करणं याकडे लोकांचा फारसा कल नसताना आणि केवळ इतरांना काय आवडेल, रुचेल, पटेल ते आणि तसंच बोलणारी, वागणारी माणसं आजूबाजूला वावरत असताना मनात येणारं बरचसं लिहू शकणाऱ्या लेखक, लेखिकांच लिखाण वाचायला मिळालं की बरं वाटतं.

एक विशिष्ट विषय, शब्दमर्यादा असं न ठेवता ब्लॉग वर जसं, जेव्हा जे जसं वाटतं तसं लिहिलं जातं तशा प्रकारचं हे लिखाण आहे. बरेच वेगवेगळे ऑफ बिट विषय यात मांडलेत. मला वाचायला आवडलं. शक्य असेल तर मिळवून सगळ्यांनीच वाचावं असं वाटतं.

Wednesday, February 10, 2010

....बरंच लिहिण्यासारखं असूनही खूप दिवसात काहीच लिहिलं नाही. 'नटरंग' आणि 'हरीश्चन्द्राची Factory' हे दोन मस्त मराठी सिनेमे पाहिले. 'ईश्कीया' पण पहिला विशाल भारद्वाजचा. चांगला वाटला.

'अमृता-इमरोझ एक प्रेमकहाणी' आणि 'रसीदी टिकट' अशी अमृता प्रीतम यांची किंवा यांच्यावरची पुस्तक वाचली. या बाई ग्रेटच होत्या असणार.
या सगळ्याबद्दल लिहायचंय पण कधी जमेल त्याचा अंदाज नाही. लवकरच काही लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा.