Thursday, April 16, 2009

प्रश्न.. प्रश्न आणि प्रश्न....

किती प्रश्न पडत असतात आपल्याला? त्यातल्या किती प्रश्नांची उत्तरं मिळतात?, मिळू शकतात? ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत त्यांचा पाठपुरावा का नाही करत आपण पुरेसा? आणि ज्या प्रश्नांची उत्तरं मिळतात ती कशी मिळतात?- आपण विचार करतो त्यातून? काहीबाही वाचतो त्यातून?, कुणाशी ठरवून बोलतो त्यातून?, ठरवून प्रयत्न करतो त्यातून?, आधीच्या स्वतःच्या अनुभवांचा आधार घेतो त्यातून की दुसर्यांचे ऐकलेले, पहीलेले अनुभव असतात त्यातून? यातल्या प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे बहुदा. थोड्याफार प्रमाणात हे सगळंच वापरतो आपण. एखाद्या वेळी 'युरेका' म्ह्टल्यासारखं उत्तर समोर दिसतं - कुणाच्या बोलण्यातून, कृतीतून किंवा पुस्तकातून. अनेकदा जुन्या- न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं अनापेक्षितारित्या मिळतात. मग तो प्रश्नं सुटला म्हणताना त्या निमित्तानं आणखी प्रश्न पुढे येतात आणि येतच रहातात- चक्र असल्यासारखे न थांबता..

जे प्रश्न सुटत नाहीत त्यांचं काय करतो आपण? करतो का पाठपुरावा? नवा, अधिक महत्त्वाचा किंवा कदाचित अधिक अवघड प्रश्न समोर आला की जुन्या प्रश्नाकडे थोडं दुर्लक्ष होणं गृहीतच आहे का? मग त्या अनुत्तरित प्रश्नांच काय? 'प्रश्न पडणं ही केवळ एक घटना आहे का? - खरं तर नाही म्हणजे प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन केवळ 'घटना' याच्यापुरता मर्यादित नसावा. मग आपण झगडत का नाही उत्तर शोधायला? कदाचित आधीच्या बर्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळाली तर पुढे पड़णार्या प्रश्नांची संख्या कमी होऊ शकेल का? आणि आपल्या विकासासाठी प्रश्नांची उत्तरं मिळणं किंवा शोधून काढणं आवश्यक नाही का?

प्रश्न सोडवायचा म्हटला की चर्चा आली, वाद आले, मतभिन्नता आली कदाचित भांड़णं मग भांड़णंही विकोपाला जाणं. सगळं नीट सान्धता आलं तर ठीक पण नाही जमलं तर ताटातूट, तणाव, मनस्ताप असं काही बाही. खरं तर या फार टोकाच्या गोष्टी झाल्या पण मुळात किती व्यक्ती प्रश्न सोड़वण्यासाठी चर्चा करायला तयार असतात? त्यातून उद्भवलेच वाद किंवा अगदी भांड़णं सुद्धा तरी त्यालाही तयार असतात? वादविवाद, भांड़णं नकोत म्हणून एकाचं कुणाचंतरी ऐकण्याकडे किती कल असतो आपला? आणि मग त्या एकाचं ऐकता ऐकता तोच नियम बनतो. रीत, रुढी अशाच बनतात का? आणि मग असे काही प्रश्न पडले एखाद्याला- चकोरीला सोडून असलेले तर मग त्या प्रश्नांचं काय? त्या प्रश्नांना देतात का कुणी महत्त्वं? ते प्रश्नं सोडवण्याचा करतं का प्रयत्नं? त्या चाकोरीबाहेरचे प्रश्न पड़णार्या माणसाचं काय होतं आणि? त्याला चकोरीतलीच, चकोरीला धरून असलेली उत्तरं मिळाली आणि त्याने ती स्वीकारली तर विशेष काही फरक पडत नसेल बहुदा पण चकोरीला सोडून असलेलं उत्तर निवड़लं तर काय होतं? कुणाची सोबत राहाते का शिल्लक त्याला? किमान समाधान तरी असतं का त्याला- आपल्याला उत्तर मिळालं त्याचं की हळहळ असते मनात- चाकोरीबाहेरचं उत्तर स्वीकारण्याची मोठी किंमत द्यावी लागली त्याबद्दलची?

ज्यांना प्रश्नांची उत्तरं मिळवणं खूप महत्त्वाचं वाटतं, चाकोरीला सोडून असेल तरीही उत्तर मिळवण्याकडे ज्यांचा कल असतो त्यांना या उत्तरांची बरीच किंमत द्यावी लागत असेल का आयुष्यात? मग त्यांनी उत्तर मिळवण्याकडे कल ठेवायचा की बाकीच्या गोष्टी साम्भाळायच्या?, किंमत कमी द्यायला लागेल असं बघायचं?

एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की कसं ठरवणार हे योग्य उत्तर आहे ते? योग्य उत्तराचे निकष कोणते? हे निकष फारच व्यक्तीसापेक्ष असणं शक्य आहे. जेव्हा स्वतःपुरते प्रश्न सोडवायचे असतील तेव्हा हे निकष वापरणं शक्य आहे पण जेव्हा स्वतःखेरीज अन्य कोणी त्याच्याशी सम्बंधित असतील तेव्हा कोणते निकष वापरायचे? आपण जे निकष वापरतोय त्यामुळे सम्बंधित कुणावर अन्याय होत नाही ना याचा विचार करतो का आपण?

किती प्रश्न आहेत मला... कधी शोधणार मी त्याची उत्तरं? बघू निदान शक्य तितके प्रयत्न करून उत्तरं शोधायला हवीत हा विचार तरी मनात आला... हेही नसे थोडके.

8 comments:

  1. hi .is this ur minds reflection?

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. that's quiet engaging.. ha 'prashna'varcha blog vachun mala kiti prashna padlet... ;-) u write very well man.not everybody can put his/her thoughts so well/coordinated or even can't put in words.( especially me..)

    ReplyDelete
  4. dhanyavad suchitra..
    Hi ek post aahe akkha blog nahi..

    ReplyDelete