Friday, April 3, 2009

प्रिय डायरी

अगं,आज गुरुपौर्णिमा आहे. आमच्या होस्टेल मधे पण गुरुपौणिँमेचा कार्यक्रम आम्ही साजरा केला. चारच दिवसांपूर्वी एक कल्पना पुढे आली होती की गुरुपौणिँमेच्या दिवशी केवळ 'गुरूजी, बाई' या अर्थी नाही तर 'एकूणच आयुष्यात ज्या ज्या कशापासून आपण शिकतो' आशा विस्तृत अर्थानं 'गुरु' या संकल्पनेबद्दल बोलायचं. मला 'नाती- आपले गुरु' हा विषय छान वाटला बोलायला. नंतर विचार करताना लक्षात आलंकी आजूबाजूची माणसं, त्यांच्याशी असलेलं आपलं नातं, सम्बंधित अनुभव विश्व यातून आपण शिकत असतो, घडत असतो, समृद्ध होत असतो तरीही आपण नाती/ नातेसंबंध याबाबत फरसा विचार नाही केलेला.

' नातं' म्हणजे नक्की काय? केवळ सम्बन्ध- परंपरेने येणारे/ रक्ताचे? म्हणजे आई-वडीलांचे भाऊ-बहिणी, काका, मामा, आत्या, स्वतःची भावंडे असे? पण अशी अगदी रक्ताची नाती पाण्याहूनही पातळ झालेली आपण पहातोच की.
अशी नाती तुटतात आणि पुन्हा जुळतच नाहीत. म्हणजे मग रक्ताच्या नात्यांना काही अर्थ उरतो का? मग एखाद्याच्या भावनेची जाण/ समज म्हणजे नातं का? - एकमेकांना समजुन घेउन त्या त्या व्यक्तिसन्दर्भात त्याच्या कलानुसार वागणं, वगावसं वाटणं म्हणजे नातं निर्माण होणं का? की फक्त 'ओळख' हेही एक नातं असतं आणि पुढे ते समृद्ध होत जातं? छोट्या ओळखीतून हळूहळू त्या माणसाचीच एकूण ओळख पटत जाते, ती आपल्याला हवीहवीशी वाटते आणि आपण नातं जोडायचा प्रयत्न करतो. अर्थात एकतर्फी पटलेली ओळख हे नातं असतं का? हा प्रश्नच आहे.

आपण तरी किती नात्यांमधे गुरफटलेले असतो ना? औपचारिक स्वरुपाची तर काही अनौपचारिक, काही आनंद देणारी, काही दुःखदायक, रागालोभाची, प्रेमाची, काही समजून घेणारी, काही समजून घ्यायला लावणारी अशी कितीतरी. काही नकोशी वाटणारी पण काही तर अशीही की जी आपल्या आयुष्यातनं कमी केली तर बाकी फारशी उरत नहीं. विश्वास, मोकळेपणा, सामंजस्य, मैत्रीभाव, आपलेपणा, प्रेम यावर आधारलेली किंवा यामुळे निर्माण झालेली नाती टिकतात, हवीहवीशी वाटतात, आवश्यकच असतात आणि आपल्याला खूप काही शिकवतात अर्थात गैरसमज, संकुचितपणा- वागण्यातला, विचारांचा; राग, द्वेष, मत्सर अशा अनेक कारणाने तुटलेली किंवा मुळातच जुळू न शकलेली नाती सुद्धा बरीच शिकवण देतात हेही खरंच.

कोणत्याही आदर्श नात्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतील, वाद होत असतील पण भांडणं होत नाहीत. एखादी गोष्ट आवडली नाही तर ते मोकळेपणाने सांगता येतं आणि दूसरा त्याचा राग मानत नाही, खोटेपणा तर मुळीच नसतो. समोरच्या व्यक्तीचा धाक वाटत असेल कदाचित पण भीती नसते. काटेकोर व्यवहार असू शकतो पण प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा हे सगळं असतच.समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांचं ओझं वाटत नाही उलट त्याला अपेक्षपूर्तीचं समाधान देताना आनंद वाटतो. आणि कधी या अपेक्षा पूर्ण करता न येणार्या, त्रासदायक वाटल्याच तर तसं स्पष्टपणे सांगण्याचं आणि ऐकून घेण्याचं धैर्य दोघांमधेही असतं. परस्पर सामंजस्य असतं, एकमेकांबांबत empathy असते, दुसर्याचे आनंदाचे, दुःखाचे, संतापाचे, उत्कटतेचे क्षण आपणही तितक्याच समरसतेने अनुभवू शकतो, त्याच्या प्रत्येक 'मूड' मध्ये सहभागी होवू शकतो. चूका करत असेल तर समजावू शकतो पण चूका करण्याची, त्यातून स्वतः , शिकण्याची, सुधारण्याची, अधिक चांगलं काम करण्याची मुभाही देऊ शकतो. चांगल्या नात्यामध्ये दोघंही एकमेकांचा, एकमेकांच्या आवड़ीनिवडींचा, तत्त्वांचा, विचारांचा, आदर्शांचा मान ठेवतात, दुसर्या व्यक्तीला ती जशी आहे तसं स्वीकारतात. एकमेकाना साम्भाळूनघेतात. एकमेकाना समजुन घ्यायला, संवाद साधायला शब्दांची भलीमोठी जाळी विणावी लागत नाहीत. केवल शान्तपणा, मूक सम्भाषणही पुरेसं होतं.

आपल्याला समृद्ध, प्रगल्भ करण्यात ही सगळी नाती खूप महत्त्वाची भूमिका वठवतात. नाती आपल्याला शिकवतातच की, कसं वागावं आणि कसं वागू नये ते. अर्थात प्रत्येक जुळलेल्या वा तुटलेल्या किंवा जुळण्याच्या प्रक्रियेत असणार्या नात्यामधून काही न काही शिकून ते पुढच्या आयुष्यात वापरण्याचा काम तर आपणच करायला हवं. अजाणतेपणी तर ते होत असतच पण जणीवपूर्वकही करायला हवं. आणि माझ्या बाबतीत, खरं तर होस्टेल मधल्या कुठल्याही मुलीच्या बाबतीत हे खरं आहे की आपल्या घरापासून, आपल्या माणसांपासून दूर राहाण्याची किम्मत द्यावी लागली तरीही आतल्या, घट्ट नात्यांचा शोध घेणं किती सोपं होतं ग. तुझं- माझं तरी कसं नातं की तुझा माझ्या खासगी आयुष्यात पण मुक्त संचार. आपलं हे गोड नातं असंच टिकवून ठेवू, अर्थातच माझ्या....

4 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. Hey Hi,
    Kharach Khup Chan ahen he likhan,
    but that prashna, Prashna & Prashna... is little bit heavy for me.
    but still its good.

    Keep writing, Keep smiling and take care of your self.

    ReplyDelete